Showing posts with label Incredible Konkan. Show all posts
Showing posts with label Incredible Konkan. Show all posts

*'माझं कोकण' *

आता 'माझं कोकण' पुढे कसं असेल? त्याचं काय होईल? माहित नाही.
दरवर्षी फेरी मारताना, प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या खुणा एकेक करत हरवत जात आहेत हे निश्चित.
माणसं बदलली आणि कोकण बदलत चाललंय.
तरीदेखील आपल्या पिढीने जे 'कोकण' बघितलंय, ते पुढच्या पिढीला बघायला मिळेल का?
'कोकण' म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं, तेच चित्र नवीन पिढीसमोर साकारलं जाईल का हे माहिती नाही. पण तसं नसेल तर ते चित्र साकारण्याचा एक अल्पसा प्रयत्न.

*'कोकण'* म्हणजे कौलारू घर,
स्वच्छ अंगण, तुळस व तिला आधार देणारा दिवा.

*'कोकण'* म्हणजे गोठा, साठवून ठेवलेलं गवत आणि गाईच्या भोवती पिंगा घालत असलेलं तिचं वासरू.

*'कोकण'* म्हणजे बाहेरची पडवी, झोपाळा, त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या.

*'कोकण'* म्हणजे माजघर, एका कोपऱ्यात पडलेलं जातं, आजीने सारवलेली चूल, फुंकून ओलसर
झालेला आईचा चेहरा.

*'कोकण'* म्हणजे देव, महापुरुष, वेतोबा, रवळनाथ, सातमाई, सातेरी, गिरोबा, रामेश्वर, कुणकेश्वर, रत्नेश्वर.

*'कोकण'* म्हणजे कौलारू देवळे, देवळा शेजारून वाहणारी छोटी नदी.

*'कोकण'* म्हणजे गर्द देवराई,
त्यात नाहीशी होणारी देवाची वाट आणि वेशीवर दिलेला नारळ.

*'कोकण'* म्हणजे घुमत असलेले ढोल, येणारी देवीची पालखी, तीला तोरण बांधण्यासाठी घरातल्यांची घाई.

*'कोकण'* म्हणजे देवचार, त्याच्या चपलांचा आवाज, मनात असलेली भीती, वाडवडिलांची पुण्याई

*'कोकण'* म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळीची झाडं.

*'कोकण'* म्हणजे सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी आणि मोरी माश्याचं कालवण.

*'कोकण'* म्हणजे चुलीवर भाजला जात असलेला बांगडा, भाकरी, आणि कांद्या-गोलम्याचा ठेचा.

*'कोकण'* म्हणजे उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या अठळा आणि फणसा-केळफुलाची भाजी.

*'कोकण'* म्हणजे भात, कैरी घातलेली डाळ, घावणे आणि वाटण घातलेली उसळ.

*'कोकण'* म्हणजे तळलेली सांडगी, कांडलेली पिठी, सुकत असलेली आंब्याची साठ आणि मुरत असलेलं लोणचं.

*'कोकण'* म्हणजे नदीला आलेला पूर, मुसळधार पाऊस आणि कोपऱ्यात पुढे सरकत असलेला नांगर.

*'कोकण'* म्हणजे पेप्सी खात जाणारी पोरं, डांबरी रस्ता, पत्र्याचा पूल आणि खालून वाहणारा व्हाळ.

*'कोकण'* म्हणजे लाल डब्याची एस्.टी., धुरळा आणि नातवांची वाट बघत स्टॉपवर उभे असलेले आजोबा.

ब्रिटीश काळात कोकण विभाग

ब्रिटीश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता. ब्रिटीश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी असे तीनच जिल्हे होते.
भारताचा पश्विम किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रात व गोव्यात कोकण म्हणून ओळखला जातो. याच पट्ट्याला दक्षिणेत, म्हणजे कर्नाटक व केरळ मधे मलबार किनारा म्हणून ओळखतात. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती... असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच स्थित आहे.
प्राचीन व पौराणिक
समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र
पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णुचा सहावा अवतार असलेल्या श्री परशूरामाने केली. परशूरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्र केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वत: परशूराम दक्षिण पर्वतांवर निघुन गेले व तेथे त्यांनी शूर्पारक देशाची निर्मीती सागरा पासुन केली असा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वात आढळतो.
पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वत:च्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचा निश्चय केला आणि त्या प्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशूरामाच्या बाणाच्या टप्प्या पर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्या प्रमाणे परशूरामाने सह्याद्री वरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्या नंतर परशूराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले.
कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मीती देखिल परशूरामाने केली अशी पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. पण गोमंतकातील (गोव्यातील) गौड सारस्वत व केरळ मधील नंबूथिरी ब्राम्हणांच्या उगमा संदर्भात देखिल याच प्रकारच्या परशूराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात अनेक ठिकाणी या आख्यायिकेला अनुरूप असे पुरावे सापडतात. रत्‍नागिरी जिल्ह्यात चिपळूण जवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशूराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशूराम मंदिर आहे.
प्रमुख आकर्षणे
मंदीरे व देवस्थाने
गणपतीपुळे
लोटे परशुराम
वेळणेश्वर
मार्लेश्वर संगमेश्वर
कर्णेश्वर संगमेश्वर
गणपती मंदिर आंजर्ला
पाली (रायगड) अष्टविनायक
मह्ड (रायगड) अष्टविनायक
हेदवीचा दशभुजा गणेश
रेडीचा गणपती
दीवेआगरचा सुवर्णगणेश्.
जलदुर्ग
सिंधुदुर्ग किल्‍ला
विजयदुर्ग किल्ला
मुरूडचा जंजीरा
सुवर्ण दुर्ग
पर्यटन स्थळे
अलिबाग
वेंगुर्ला
गुहागर
श्रीवर्धन
हरिहरेश्वर
रत्‍नागिरी
महाराष्ट्राचे भूषण रायगड किल्ला.
मालवण
मुरूड- हर्णे
थंड हवेची ठिकाणे
माथेरान
आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा)
Beauty Of Konkan  निसर्ग सौंदर्य कोकण's photo.

कोकण रेल्वे

कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर ह्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण ह्या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील रोहा येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. २६ जानेवारी १९९८ रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी ७४१ किमी आहे.
इतिहास
मुंबई व मंगळूर ह्या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने (पुणे-सोलापूर-बंगळूर) चालू होती. तसेच उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे चालू करण्यात अनेक अडथळे येत होते. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मधू दंडवते, जॉर्ज फर्नान्डिस इत्यादी कोकणी नेत्यांनी केंद्रीय पातळीवर कोकण रेल्वे बांधण्याची मागणी चालू ठेवली. १९६६ साली दिवा-पनवेल मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला. १९९० साली तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नान्डिसांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमधील सी.बी.डी. बेलापूर येथे मुख्यालय असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले चेअरमन होते. १५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ पार पडला.
७४० किमी लांबीचा हा मार्ग महाड, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवार व उडुपी ह्या प्रत्येकी १०० किमी लांबीच्या ७ भागांमध्ये विभागण्यात आला व प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. परदेशांमधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली. लार्सन अँड टूब्रो, गॅमन इंडिया ह्या भारतामधील मोठ्या बांधकाम कंपन्यांना बांधकामाची कंत्राटे दिली गेली. भूसंपादनामधील अडथळे, अनेक कोर्ट खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात येणारे पूर व कोसळणाऱ्या दरडी इत्यादी बाबींमुळे कोकण रेल्वेच्या बांधकामाचे वेळापत्रक रखडले. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी ह्या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ६ वर्षांचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले.


गणेशगुळे श्रीगणेश....!!!

 गणेशगुळे श्रीगणेश....!!!

गणेशगुळे रनपार बंदरासमोरील डोंगर व मुसाकाझी बंदराकडे जाणारा डोंगर या दोन डोंगरांच्या मध्यभागी समुद्रकिनारी वसले आहे. हे गाव रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर आहे. श्रीगणेशाच्या वास्तव्यामुळेच या गावाला गणेशगुळे हे नाव पडले. गणपतीपुळेप्रमाणेच गणेशगुळे हे गणेशाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर डोंगरावर बांधलेले आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून, ते आजही चांगल्या स्थितीत आहे. मंदिराचा चौथरा डोंगराच्या पाश्र्वभूमीवर बांधलेला असून, तो सुमारे ३५ फूट उंच आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. पुढील बाजूच्या उजव्या दालनालगतचे दार पूर्णपणे बंद आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजे श्रीगणेश असे मानले जाते. या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते - पावसचे ग्रामस्थ रामचंद्रपंत चिपळूणकर दशग्रंथी ब्राह्मण होते. ते गणेशभक्त होते. त्यांना पोटशुळाचा विकार जडला. ते गणेशगुळे येथील समुद्रात जीव द्यायला निघाले; परंतु वाटेतच इतक्या असह्य वेदना सुरू झाल्या की त्यांना पुढे पाऊल टाकता येईना. त्यामुळे ते झुडपात पडून राहिले. त्यांनी गणेश अनुष्ठानाला सुरुवात केली. त्या ध्यानस्थ अवस्थेत २१व्या दिवशी श्रीगणेशाने त्यांना दृष्टांत दिला. ‘माझे जेथे अवशेषात्मक वास्तव्य आहे, तेथे तू माझे मंदिर बांध, तुला याकामी सातारचे शाहूमहाराज मदत करतील. तू व्याधिमुक्त होशील’, या दृष्टांताबरोबरच श्रीगणेशाने सातारच्या शाहूमहाराजांनांही दृष्टांत दिला. त्याप्रमाणे आर्थिक मदत घेऊन महाराजांकडून त्यांचा दूत आला. चिपळूणकरांचा पोटशूळ श्रीकृपेने बरा झाला, ही वार्ता वाऱ्यासारखी गावात व पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे हा गणपती व्याधिग्रस्त व दु:खी पीडितांच्या व्याधी व दु:ख नाहीसे करणारा म्हणून प्रसिद्ध पावला. श्रीगणेशाच्या नाभीतून पाण्याची संततधार वाहत असे. हे पाणी गोमुखातून बाहेरच्या बाजूला पडत असे. एकेदिवशी हे पाणी पडणे बंद झाले. त्याच दिवशी या गणपतीने गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले असे सांगितले जाते. याची साक्ष म्हणून तेथून दीड किमीवर असलेल्या पावस मार्गावरील डोंगरावर श्रीगजाननाच्या एका पायाचा ठसा उमटलेला आहे असे मानले जाते. हे मंदिर एका बाजूला असून निसर्गाच्या सान्निध्यात असून येथील वातावरण हे प्रसन्न, शांत असल्याने येथे अनेक भाविक श्रीगणेशाच्या दर्शनासाठी येतात...!!!
गणपतीचे हे स्थान पावस या गावापासुन साधारण २-३ किमी अंतरावर एका डोंगरावर वसले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिळा असल्याने हे द्वार बंद केले गेले आणि त्या शिळेलाच श्रीगणेश मानून तिची पूजा केली जाते. अलिकडेच या शिळेवर श्रीगणेशाकृती प्रकट झाली असल्याणे "गुळ्याचा गणपती पुळ्यास गेला आणि पुन्हा प्रकट झाला" असे मानले जाते. गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला या म्हणीवरून हे गाव प्रसिद्ध आहे. हे गाव मुसाकाजी बंदराकडे जाणारा डोंगर व बंदरासमोरील डोंगर असा दोन डोंगरांच्या मध्यभागी वसले आहे. जवळच समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनार्‍यावरील वाळू बांधकामाला उपयुक्त अशी विशिष्ट क्रिस्टल स्वरूपात आहे. हे मंदिर पुरातन काळातील आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून, मंदिर आजपण चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते, ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
रत्नागिरी-पावस अंतर साधारण १८-२० किमी
पावस-गणेशगुळे अंतर साधारण २-३ किमी